⁠  ⁠

एमपीएससी : परीक्षेला जाताना…

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

राज्यसेवा पूर्वपरीक्षा येत्या रविवारी होत आहे. ऐनवेळची तयारी तसेच परीक्षा हॉलमधील नियोजन याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या दोन ओळखपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात असे हॉल तिकिटामध्ये नमूद असते. पण ऐनवेळी एका / दोन्ही ओळखपत्राची प्रतच नसणे किंवा एकच ओळखपत्र बाळगणे अशा बाबींमुळे धावपळ होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण अजूनही बऱ्यापैकी आहे. हे टाळण्यासाठी आदल्या दिवशीच आवश्यक बाबींची तयारी करून ठेवावी.

वेळेचे नियोजन

* प्रश्नपत्रिकेतील प्रश्नसंख्या, अवघड आणि सोप्या प्रश्नांचे प्रमाण आणि ते सोडविण्यासाठी मिळणारा वेळ यांची सांगड घालून वेळेचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे.

* प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर लगेचच सोडवायला सुरुवात करावी. सगळी प्रश्नपत्रिका वाचत बसू नये. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून त्याच्या उत्तराला खूण करत पुढे जावे.

* एखाद्या प्रश्नाबाबत काही शंका किंवा गोंधळ वाटत असेल, अवघड वाटला असेल तर प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाच्या क्रमांकाला खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडवायचा पहिला राऊंड संपवावा. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्यांची उत्तरपत्रिकेत योग्य नोंद झाली आहे ना, हे पाहावे. किंवा प्रश्न सोडवतानाच उत्तर पत्रिकेमध्ये खुणा केल्या तरी हरकत नाही. पण त्यावेळी आपण सोडून दिलेल्या प्रश्नासमोर तर खूण करत नाही ना, योग्य प्रश्नक्रमांकासमोरच करत आहोत ना हे काळजीपूर्वक पाहावे.

* आता दुसरी फेरी. अवघड वाटणारे प्रश्न पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही आधीच खुणा करून घेतल्या असतील तर हे प्रश्न शोधण्यात वेळ वाया जात नाही.

* थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवायला हवा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या सर्वेमधून ही गोष्ट सामोरी आली आहे, की उमेदवाराला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर बरोबर आहे असे वाटलेले असते तेच उत्तर बहुतेक वेळा बरोबर असते.

* सी सॅटमधील प्रसंगाधारित प्रश्न पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हे तुम्ही स्वत:च ठरवायचे आहे.

* अवघड वाटणारे प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवायचा प्रयत्न करावा. पण जोपर्यंत आपण शोधलेले उत्तर बरोबर आहे याची खात्री वाटत नाही तोपर्यंत उत्तर पत्रिकेत खूण करू नये. अनोळखी वाटणाऱ्या प्रश्नांना हातच लावायचा नाही. अन्यथा नकारात्मक गुणपद्धतीचा फटका बसू शकतो.

* प्रश्न वाचनानंतर लगेच उत्तर आठवले हे तथ्यात्मक ((factual) प्रश्नाबाबत ठीक आहे. पण बहुविधानी प्रश्न मूलभूत तपशील विचारणारे (concept based) असतात. त्यामुळे असे प्रश्न व्यवस्थित समजून घेऊनच उत्तरांचे पर्याय वाचावेत. किमान दोन वेळा प्रश्न वाचला जावा व तितक्याच दक्षतेने उत्तरांचे पर्याय वाचून मगच उत्तरावर खूण करावी.

उत्तरपत्रिकेची काळजी

* MPSC च्या उत्तरपत्रिका या non-leaded OMR sheet स्वरूपाच्या असतात. त्यावर बॉलपेनाने खुणा कराव्या लागतात, त्यामुळे त्या काळजीपूर्वक करायला हव्यात.

* आयोगाच्या उत्तरपत्रिका या OMR sheet असल्याने खाडाखोड, फाटणे, चुरगळणे, घाण होणे असे काही केल्यास त्या तपासल्याच जात नाहीत. त्यामुळे या उत्तरपत्रिका हाताळताना, त्यात माहिती भरताना आणि उत्तरांवर खुणा करताना विशेष काळजी घ्यायला हवी.

* उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो.

यानंतर शाई पुसण्यासाठी टिश्यू पेपर दिला जातोच. पण घाम आल्याने किंवा आणखी काही कारणाने या शाईचा डाग उत्तरपत्रिकेवर पडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

* उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी. चौकोनात लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील खुणा यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवून घ्यावा.

* पेपर १ मध्ये १२० मिनिटांत १०० प्रश्न सोडवायचे आहेत. तर पेपर २ मध्ये १२० मिनिटांत ८० प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन आणि OMR sheet ची काळजी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत हे लक्षात घ्यावे.

* उत्तरपत्रिकेच्या ओएमआर शीटवर तुम्ही रंगवलेले गोल तुमचे भविष्य ठरवतात. म्हणूनच या शीटबरोबरचे तुमचे वर्तन सावधानीचे असले पाहिजे. १२० मिनिटांच्या परीक्षेत १०० गोल रंगवायला किमान १५ मिनिटांचा वेळ लागतो. हा वेळ काळजीपूर्वक वापरला पाहिजे. कारण फक्त एका प्रश्नाचा क्रम चुकला की त्यापुढच्या सगळाच क्रम चुकलेला असतो आणि परिणामी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न फसलेला असतो. एक प्रश्न सोडवून तो शीटवर नोंदवा किंवा सगळे प्रश्न सोडवून झाल्याअंती शेवटी एकाच वेळी नोंद करा, यातला पर्याय तुम्ही, तुमच्या सोयीने निवडा. पण उत्तरे नोंदवण्याचे काम सावधगिरीने केले पाहिजे.

-फारूक नाईकवाडे
सदर लेख हा दैनिक लोकसत्तामधील आहे

Share This Article