⁠  ⁠

MPSC Dailly Current Affairs 1 January 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 5 Min Read
5 Min Read

1) भारत आर्थिक प्रगतीकडे
जागतिक मंदी २००८ मध्ये सुरू झाली होती, तिला १० वर्षे होतील. चांगली गोष्ट म्हणजे २०१८ मध्ये जगातील सर्व मोठ्या विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र पुढे जाणार आहेत. अमेरिका, युरोपियन युनियनसोबतच आशिया आणि मध्य-पूर्वेचे देशही प्रगती करतील. ब्राझील आणि रशिया या वर्षी मंदीतून बाहेर पडतील. अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी अमेरिकेने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कर सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे गोल्डमॅन सॅकच्या अंदाजानुसार २०१८ मध्ये जागतिक जीडीपी ४% दराने वाढेल. २०१७ मध्ये ती ३.७ % राहू शकते.

– कॉर्पोरेट करात १४% च्या सवलतीमुळे गुंतवणूक वाढेल, अर्थव्यवस्थेत जास्त रक्कम येईल.
– पुढील १० वर्षांत फक्त ४०-५० हजार डॉलर कमावणारे ५८० कोटी डॉलरचा कर जमा करतील.
– चीननेही विदेशी कंपन्यांना १ जानेवारीपासून करात सवलत देण्याची घोषणा केली आहे.
– ५ ते १० वर्षांत जीडीपी ५% पर्यंत वाढेल. वेतनात वार्षिक ४ हजार डॉलरची वाढ होईल.

2) सराफा बाजारात सोने आणि चांदीत चमक
वर्षाच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी सराफा बाजारात सोने आणि चांदीत जबरदस्त चमक दिसून आली. सोने १७५ रुपयांच्या तेजीसह ३०,४०० रुपये प्रती दहा ग्रॅमवर पोहोचले. हा महिनाभरातील उच्चांकी भाव आहे. विदेशात आलेली मजबुती आणि स्थानिक सराफा व्यापाऱ्यांची मागणी वाढल्यामुळे सोन्याला आधार मिळाला. डॉलरमध्ये या वर्षी कमजोरी राहिल्याने या महागड्या धातूंच्या दरात तेजी राहिली.
– २८,३०० रुपये प्रती दहा ग्रॅम होते सोने गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०१६ रोजी
– ३९,४०० रुपये प्रती किलोग्रॅम होती चांदी गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०१६ रोजी

* भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी २०१७ वर्ष खूपच उत्साहाचे राहिले. वर्षभरात मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये २८ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४५.५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. वर्षभरात सेन्सेक्स ७,४३०.३७ अंकांनी वाढला म्हणजेच यात २७.९१ टक्क्यांची वाढ झाली. यावर्षी ३६ कंपन्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला.

3) भारतीयांच्या नेटवर्थमध्ये १५.४ लाख कोटींची वाढ
जगभरातील ४९ देशांतील ५०० सर्वाधिक श्रीमंत लाेकांच्या संपत्तीत २०१७ मध्ये ६० लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ चौपट जास्त आहे. २६ डिसेंबर रोजी या सर्वांचे नेटवर्थ ३४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे वर्षभरापूर्वी २८५ लाख कोटी रुपये होते. ४४० अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाली, तर ६० जणांची संपत्ती कमी झाली आहे.

* जेफ बेजोंच्या नेटवर्थमध्ये २.२ लाख कोटींची वाढ
– अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या नेटवर्थ नोव्हेंबरमध्ये ६.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
– बेजो यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकले. ५.९ लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थसह गेट्स दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.
– बेजो यांच्या नेटवर्थमध्ये या वर्षी २.२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. दुसऱ्या क्रमांकावर चीनचे हुइ का यान हे आहेत. त्यांची संपत्ती १.७ लाख कोटी वाढली आहे.

* भारतीयांच्या नेटवर्थमध्ये १५.४ लाख कोटींची वाढ
– भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती १५.४ लाख कोटी रुपये आहे, यात ३०.८% वाढ झाली
– सर्वाधिक श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांचे नेटवर्थ ७६% म्हणजेच १.१३ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. रकमेच्या दृष्टीने भारतातील सर्वाधिक वाढ आहे. त्यांचे एकूण नेटवर्थ २.६ लाख कोटी रुपये आहे.
– स्टील टायकून एल.एन. मित्तल १.२६ लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

4) सकारात्मक शांतता निर्देशांकामध्ये भारत 163 देशांत 90व्या स्थानावर
जगात अशांतता, राजकीय अस्थैर्य असताना सकारात्मक बातमी आली आहे. मागील एका वर्षापासून अनेक देशांत संघर्ष सुरू आहे. पण तरीही जगातील १६३ पैकी ९३ देशांमध्ये शांततेचे वातावरण निर्माण झाले. यात भारत ९० व्या स्थानावर आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस संघटनेने त्यांच्या अहवालात यासंदर्भात माहिती दिली. सकारात्मक शांतता निर्देशांक-२०१७ अहवालात विविध देशातील २००५ ते २०१६ दरम्यान व्यवसाय, राजकारण, पर्यावरण आदी निकषांवर शांततेचे स्तर निश्चित केले आहेत. निर्देशांकानुसार ६३ देशांत शांततेचे वातावरण कमी झाले. याशिवाय प्रत्येक देशात शांततेचा स्तर ०.२८ टक्के वाढला. आइसलँड सर्वात शांत देश आहे, तर सिरिया सर्वात अशांत आहे. सरकारसंबंधी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

* आठ निकषांवर रँकिंग
सकारात्मक शांतता निर्देशांकात आठ निकषांवर रँकिंग दिली गेली. यात व्यावसायिक वातावरण, माहिती देणे, मानव संपदा, संसाधने, दुसऱ्यांच्या अधिकारांप्रति सन्मान, स्थिर सरकार आणि भ्रष्टाचार यांचा समावेश आहे. त्यांना २४ भागांत वितरित केले गेले आहे. यात प्रामुख्याने लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, जीडीपी, कायदा व सुव्यवस्था, माध्यमांचे स्वातंत्र्य आदी निकष सामील आहेत.

Share This Article