⁠  ⁠

Current Affairs 2 & 3 April 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 6 Min Read
6 Min Read

1) GSAT-6A उपग्रहाचा संपर्क तुटला

लष्कराच्या दूरसंचार सेवांना शक्तिशाली बनवणाऱ्या या उपग्रहाचं गुरुवारी संध्याकाळी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. मात्र, ४८ तासांच्या आतच GSAT-6A च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या शक्तिशाली दूरसंचार उपग्रहाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोशी संपर्क तुटला आहे. ‘यशस्वी प्रक्षेपणानंतर उपग्रह तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील ‘जनरल ऑपरेटिंग’ प्रक्रियेत असताना संपर्क तुटला. GSAT-6A शी पुन्हा संपर्क साधण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत,’ अशी माहिती इस्त्रोनं दिली आहे. उपग्रहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं इस्रोच्या वतीनं सांगण्यात येत असलं तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, पॉवर सिस्टम फेल झाल्यामुळं संपर्क तुटला आहे. GSLV-F08 लॉन्चपॅडच्या साह्याने २१४० किलो वजनाचा GSAT-6A हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.

2) हाफिजचा राजकीय पक्ष मिल्ली मुस्लिम लीग दहशतवादी संघटना, अमेरिकेने केली घोषणा

अमेरिकेने मंगळवारी मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज साईद याने या पक्षाची स्थापना केली होती. हाफिजने 23 मार्चला एमएमएलचे घोषणापत्र जारी केले होते. मिल्ली मुस्लिम लीग ला राजकीय पक्षाला मान्यता मिळण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानेही मार्ग मोकळा केला होता.

द यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट यांनी एक संशोधन सादर केले आहे. त्यानुसार, लष्कर-ए-तोएबा यासोबत एमएमएल आणि तहरीक-ए-आजादी-ए-काश्मीर (टीजेके) या तीन संघटनांना दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. याशिवाय एमएमएलच्या 7 सदस्यांना ‘लष्कर’साठी काम करण्यामुळे या दहशतवाद्यांचा यादीत टाकले आहे.

लष्कर-ए-तोएबा या संघटनेची स्थापना 1980 च्या दशकात झाली होती. 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्याला ही संघटना जबाबदार होती. या हल्ल्यात 166 जणांना प्राण गमवावे लागले होते. अमेरिकेने लष्करला 26 डिसेंबर 2001 मध्ये विदेशी आणि जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले होते.

3) ज्येष्ठ समाजवादी नेते भाई ऊर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृह राज्यमंत्री भाई ऊर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य (८९) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

भाई वैद्य यांचा परिचय

> शालेय जीवनातच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांनी भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या काळात त्यांनी जबरदस्त मारहाण आणि तुरूंगवास भोगला. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी १९ महिने तुरूंगवास सोसला. मूळ पिंड चळवळ आणि संघर्षाचा असल्याने त्यांना तब्बल २५ वेळा कारावास भोगला.

> शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून ८८व्या वर्षी त्यांनी अटक करवून घेतली. मूल्याधारित राजकारण त्यांनी प्रिय मानले. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली भारतयात्रेत त्यांनी चार हजार किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली. जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली.

> पुण्याचे महापौर आणि राज्याचे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. या काळात एका गुन्हेगाराचे साथीदार लाच म्हणून मोठी रक्कम घेऊन आले, तेव्हा वैद्य यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. सेवादलाचे हेच संस्कार पुढील पिढ्यांमध्ये रुजविण्याचा आग्रह वैद्य यांनी धरला.

> मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक मांडणे, गृहमंत्री या नात्याने पोलिसांना फूल पँट देणे आणि सेवानिवृत्तांच्या निवृत्तिवेतनाची महागाईशी जोडणी करण्याचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. सत्ता असो किंवा नसो, पद असो किंवा नसो, तळागाळातील जनता, गोरगरीब नागरिक, विद्यार्थी अशा कोणावरही अन्याय झाला की धावून जाण्याचे व्रत वैद्य यांनी सतत अंगिकारले आणि सदैव न्यायाची बाजू घेतली.

4) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी मागितली अरुण जेटलींची माफी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माफी मागितली आहे. तडजोडीची इच्छा व्यक्त करत दोघांनीही दिल्ली न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे. जेटली यांची माफी मागताना केजरीवाल यांनी एक पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, डीडीसीए अध्यक्षपदाच्या कार्यकाळात डिसेंबर २०१५ मध्ये मी आपणावर काही आरोप लावले. खासगी स्तरावर काही लोकांनी मला चुकीची माहिती दिली. तसेच आरोपाचे समर्थन करणारे पुरावेही सापडू शकले नाहीत. याआधी केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते कपील सिब्बलचे सुपूत्र अमित सिब्बल, पंजाबचे माजी मंत्री बिक्रमसिंह मजिठीया यांची माफी मागत तडजोडीसाठी अर्ज दिले आहेत. या प्रकरणात केजरीवाल यांच्या व्यक्तिरिक्त राघव चड्ढा, संजय सिंह, आशुतोष आणि दीपक बाजपेयी यांनीही जेटलींची माफी मागितली आहे. कुमार विश्वास यांनी मात्र माफी मागितली नाही.

5) लॉकी रॅन्समवेअरनंतर भारतीय सायबर स्पेसमध्ये गँ्रड क्रॅब नावाचा नवा रॅन्समवेअर सक्रिय

जगभरात हजारो संगणक व मोबाइल लॉक करून खंडणी वसुली करणाऱ्या लॉकी रॅन्समवेअरनंतर भारतीय सायबर स्पेसमध्ये गँ्रड क्रॅब नावाचा नवा रॅन्समवेअर सक्रिय होत आहे. हासुद्धा लॉकीप्रमाणे मोबाइल व संगणक हॅक करून लॉक करतो. पुन्हा सिस्टिम सुरू करण्याच्या मोबदल्यात खंडणी मागतो. रशियन हॅकर्संनी तयार केलेला ग्रँड क्रॅब व्हायरस जानेवारीत सर्वत्र पसरला. याचा फटका ५३ हजार युजर्सना बसला. विशेष बाब म्हणजे, हॅकर्स अनेक अवैध वेबसाइट्सना हा व्हायरस पसरवण्यासाठी दलाली देत आहेत. गृहमंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार चार वर्षांत साडेतीनशे सरकारी वेबसाइट हॅक झाल्या आहेत. २०१३ मध्ये १८९, २०१४ मध्ये १६५, २०१५ मध्ये १६४, २०१६ मध्ये १९९ व २०१७ मध्ये ११४ सरकारी वेबसाइट हॅक करण्यात आल्या. तर एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत २२ हजार वेबसाइट हॅक झाल्या आहेत.

6) तेराशेहून अधिक रोबोंच्या नृत्याचा गिनेस विक्रम

इटलीमध्ये एकाचवेळी १३७२ ह्य़ुमनॉइड यंत्रमानवांनी केलेल्या नृत्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली असून त्यामुळे चीनमधील विक्रम मोडला गेला आहे. २०१६ पासून तंत्रज्ञान कंपन्या नर्तक रोबोटसची निर्मिती करीत असून त्यात एकाचवेळी जास्तीत जास्त रोबोंच्या नृत्याचा विक्रम करण्याचा एक उद्देश आहे. चीनमध्ये गतवर्षी ऑगस्टमध्ये १०६९ डोबी यंत्रमानव म्हणजे रोबोटनी एकाचवेळी केलेल्या नृत्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली होती. अलीकडचा विक्रम हा इटलीत झाला असून अल्फा १ एस रोबोंनी सामूहिक नृत्य केले. हे रोबो ४० सें.मी उंचीचे आहेत व ते अ‍ॅल्युमिनियमच्या संमिश्रापासून प्लास्टिक आवरणाने तयार केले आहेत. ह्य़ूमनॉइड रोबो चीनच्या उबटेक कंपनीने तयार केले असून याच रोबोंनी २०१६ मध्ये पहिला विक्रम केला होता.

Share This Article