⁠  ⁠

Current Affair 11 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

जैवतंत्रज्ञानाच्या विकासात बेनेट विद्यापीठाचा हातभार

  • अमेरिकी कंपनी ‘जेनेनटेक’द्वारे एकत्रित डीएनए तंत्रज्ञानामार्फत मानवासाठी पहिल्यांदा इन्सुलिन तयार करण्यात आले, तेव्हा खऱ्या अर्थाने जीवशास्त्राचे जैवतंत्रज्ञानाच्या प्रमुख अभियांत्रिकी विद्याशाखेत रूपांतर व्हायला सुरुवात झाली.
  • गुरे आणि डुकरांपासून तयार करण्यात आलेल्या या इन्सुलिनद्वारे अनेक वर्षे मधुमेहरुग्णांवर उपचार केले गेले व त्याने हजारोंचे प्राणही वाचले; परंतु या इन्सुलिनमुळे संसर्गाच्या तक्रारीही येत होत्या.
  • यातूनच पुढे जाऊन परिपूर्ण इन्सुलिन तयार करण्याची गरज भासू लागली व त्यादृष्टीने प्रयत्नही होऊ लागले. अर्थात, बेनेट विद्यापीठ याकामी फारच गंभीर आणि सातत्याने प्रगतिशील राहिले असून, जैवतंत्रज्ञानाच्या विकासात मोलाचा हातभार लावत आहे.
  • ई. कोली या सुक्ष्मजंतूंचा वापर करून आनुवंशिकदृष्ट्या प्रगत सिंथेटिक असे पहिले मानवी इन्सुलिन १९७८ मध्ये तयार करण्यात आले.
  • एली लिली कंपनीने १९८२ मध्ये ‘ह्युमुलिन’ नावाने पहिल्यांदा जैवसंश्लेषक मानवी इन्सुलिन व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध करून दिले. औषधोत्पादक कंपनीने तयार केलेले व परवाना असलेले हे पहिले विक्रीयोग्य उत्पादन होते.
  • एखाद्या विशिष्ट डोमेनसंबंधी तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये विकसित करणे हाच केवळ यामागचा हेतू नसून, पदवीधरांमध्ये अगदी पहिल्या सत्रापासून उद्योजक मानसिकता विकसित करणे हेदेखील यामागचे उद्दिष्ट आहे. हे करताना मुख्यत्वे विद्यार्थ्यांसाठी संशोधनसक्षम आणि प्रकल्पाधारित अभ्यासक्रम तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले गेले.
  • अभ्यासक्रमाची बांधणी करताना स्टॅनफोर्ड, हार्वर्ड, एमआयटी, यूसी बर्केली, जॉर्जिया टेक, कॅलटेक, जॉन होपकिन्स विद्यापीठ, प्रिन्सटोन, येल, कॉर्नेल आदी जगभरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थामध्ये अंमलात आणल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावरही बारीक लक्ष ठेवले जाते. याशिवाय उद्योग इंटर्नशिप, परदेशी संस्थांमध्ये विनिमय आणि भारत व देशाबाहेरील संशोधन व विकास संस्थांमध्ये विशिष्ट विषयावर आधिरित संशोधन प्रकल्पाची संधीही बेनेट विद्यापीठामार्फत दिली जाते.

भारताचा अनौपचारिक सहभाग : परराष्ट्र मंत्रालय

  • गेली अनेक वर्षे तालिबानी दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानातील शांततेसाठी होणाऱ्या “मॉस्को शांतता परिषदेत’ तालिबानचा सहभाग असूनही भारत सहभागी होणार असल्याच्या मुद्द्यावरून मोठे वादळ उठले होते.
  • या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने, “भारत या परिषदेत अनौपचारिकरीत्या सहभागी होणार आहे’ असे स्पष्टीकरण देण्यात आले.
  • दहशतवादी कारवायांसाठीच ओळखल्या जाणाऱ्या तालिबानला भारताने त्याच्या जन्मापासूनच कडाडून विरोध केलेला आहे.
  • अफगाणिस्तानात शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी रशियाने पुढाकार घेऊन मॉस्कोमध्ये ही बैठक बोलावली असून त्यात भारत, चीन, तालिबान, पाकिस्तान हे देश सहभागी होतील.

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक अविनाश डोळस यांचे निधन

  • आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. अविनाश डोळस यांचे आज सकाळी सहा वाजता वयाच्या ६७ वर्षी निधन झाले. प्रा. डोळस राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य व प्रकाशन समितेचे सदस्य सचिव होते.
  • आंबेदिंडोरी (ता.दिंडोरी, जि.नाशिक) येथील प्रा . अविनाश डोळस हे औरंगाबादेतील नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा येथे रहात होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९५० रोजी झाला होता.
  • मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते.
  • जानेवारी 1990 मध्ये नांदेड येथे भरलेल्या पाचव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. जानेवारी 2011मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या 12 व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
  • आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा. रायमाने, आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ, आंबेडकरी विचार आणि साहित्य, महासंगर (कथासंग्रह), सम्यकदृष्टीतून… अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर मिझोरमच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली

  • निवडणूक आयोगानं मिझोरमचे मुख्य निवडणूक अधिकारी एसबी शशांक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोरममध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शशांक यांना हटवण्याची मागणी होत होती.
  • राजधानी ऐझॉलसह अनेक शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी शशांक यांना हटवण्यासाठी निदर्शनंही केली होती.
  • 40 जागा असलेल्या मिझोरम विधानसभेसाठी या महिन्याच्या 28 तारखेला मतदान होणार आहे.
  • निवडणूक अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी जोर धरत असतानाच निवडणूक आयोगाची समिती मिझोरममध्ये दाखल झाली होती. त्यांच्या अहवालानंतर निवडणूक अधिकाऱ्याला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • निवडणूक आयोगानं राज्याचे प्रधान सचिव(गृह)ललनुनमाविया चुआऊंगो यांनाही हटवलं आहे.
  • 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये मतदान होणार आहे. राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतही निवडणुका होत आहेत. पाच राज्यांतील मतदानाची मोजणी 11 डिसेंबरला होणार आहे.

महागाई दर १२ महिन्यांच्या नीचांकावर

  • ऑक्टोबर महिन्यातील महागाई दर ३.६७ टक्क्यांसह १२ महिन्यांच्या नीचांकावर राहण्याचा अंदाज ‘रॉयटर्स’ने व्यक्त केला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही कमी असेल, असे अभ्यासात समोर आले आहे.
  • इंधनाचे वाढते दर व घसरणारा रुपया यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अर्ध वर्षात (आॅक्टोबर २०१८ ते मार्च २०१९) महागाई दर ४ टक्के अथवा त्याहून अधिक असेल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता.
  • प्रत्यक्षात मात्र सप्टेंबर महिन्यात महागाई दर ३.७७ टक्के राहीला. आता ऑक्टोबर महिन्यात महागाई दर ३.६७ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज या अभ्यासात मांडण्यात आला आहे. देशभरातील ३५ प्रमुख अर्थतज्ज्ञांनी या अभ्यास अहवालात यासंबंधी मत मांडले आहे.
  • कच्चे तेल ७ रुपयांनी स्वस्त
    आंतरराष्ट्रीय बाजारात फेब्रुवारी महिन्यात ६३ डॉलर प्रति बॅरल (११९ लिटर) असलेले कच्चे तेल ऑक्टोबरपर्यंत ८६ डॉलरवर पोहोचले. आता ते ७० डॉलरवर आले आहे. त्याचवेळी डॉलरसमोर रुपयासुद्धा मजबूत झाला आहे.
    सध्या डॉलरचा दर ७२.४० रुपये आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ७ रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे.
    या सर्वांचा परिणाम देशांतर्गत इंधनावर होऊन महागाई दरात घट होण्याची शक्यता आहे, असे मत स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनीही व्यक्त केले आहे.
Share This Article