⁠  ⁠

स्पर्धा परीक्षांविषयी सर्वांना पडणारे प्रश्न

Sunil Deshmukh
By Sunil Deshmukh 6 Min Read
6 Min Read

सध्या राज्यातील खूप विद्यार्थी हे UPSC तसेच MPSC च्या परीक्षांकडे करीअरची संधी म्हणून पाहू लागले आहेत. या क्षेत्रात असलेल्या करिअर संधीबाबत विद्यार्थी तसेच पालकांना प्रचंड उत्सुकता दिसून येते. सदरच्या लेखात आपण राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेविषयी अनेकांना असणाऱ्या काही बेसिक प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

१) MPSC Rajyaseva परीक्षा कोण देऊ शकतो?

महाराष्ट्र रहिवासी असलेली तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली व्यक्ती ह्या परीक्षेला पात्र ठरू शकते. साधारण प्रवर्गासाठी किमान 19 व कमाल 38 वर्षे अशी वयोमर्यादा आयोगाकडून जाहिर केली गेलेली आहे.

२) जर उमेदवार मागासप्रवर्ग/अपंग/पात्र खेळाडू असेल तर वयोमर्यादेत शिथीलता आहे का?

हो, आयोगाने वयाची शिथीलत खालील बाबतीत नमूद केलेली दिसते.

i. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत शिथीलता
ii. अपंग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षापर्यंत
iii. पात्र खेळाडू यांच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत

3) MPSC Rajyaseva परीक्षेतून कोणकोणती पदे भरली जातात?
राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून नुकत्याच वाढीव अशा 3 पदांसह एकूण 24 प्रकारची वेगवेगळी पदे भरली जातात. त्यातील काही महत्वाची पदे खाली नमूद केली आहेत.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसीलदार, सहा.विक्रीकर आयुक्त, जिल्हा उप निबंधक, गटविकास अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखाधिकारी इ.

4) MPSC Rajyaseva परीक्षा किती टप्प्यांची आहे?
ही परीक्षा खालील प्रकारे 3 टप्प्यांमध्ये घेण्यात येते.
A. पूर्व परीक्षा – 400 गुण – वस्तुनिष्ठ
B. मुख्य परीक्षा – 800 गुण – वस्तुनिष्ठ (1 पेपर वगळता)
C. मुलाखत – 100 गुण

या परीक्षेसाठीची जी प्रश्‍नपत्रीका उपलब्ध होत असते, त्या परीक्षेचे प्रश्‍न मराठी तसेच इंग्रजी भाषेत दिलेले असतात, परीक्षेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असल्याने उमेदवाराला भाषा ही काही अडचणीची बाब ठरत नाही, असे असले तरी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी मराठी लिहिता, वाचता, बोलता येणे अपेक्षीत आहे.

5) सुरुवात कशी करायची?

स्पर्धा परीक्षांच्या तयारीला उमेदवाराने शक्य तितक्या कमी वयापासून केलेली चांगली, काही उमेदवार अगदी 12 वी पासूनच UPSC व MPSC परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात याचा फायदा असा की, उमेदवार पदवी पूर्ण केल्याबरोबर लगतच्या वर्षात अधिकारी होऊ शकतो. पदवीच्या शेवटच्या वर्षात असतांना जरी पूर्व परीक्षा उमेदवार देऊ शकत असला तरी मुख्य परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने पदवी संपादन केलेली असली पाहिजे.

6) पण अभ्यास कसा करु?

सर्वप्रथम उमेदवाराने परीक्षेच्या अभ्यासक्रम समोर ठेवावा, जो राज्य लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. आपल्याला या परीक्षेकरीताचे स्वरुप काय आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. यानंतर शालेय तसेच NCERT च्या पुस्तकांचे वाचण मग संदर्भ पुस्तके व सराव चाचण्या असा क्रम असावा.

7) गत वर्षाच्या प्रश्‍नपत्रीकांचे विश्‍लेषण उपयोगी आहे का?

– निश्‍चितच गत वर्षीच्या प्रश्‍नपत्रीकांचे विश्‍लेषण तसेच शालेय पाठ्यक्रमाच्या वाचनांमुळे या परीक्षांसाठी लागणारे बेसीक पूर्ण होऊ शकेल. विविध पाठ्यक्रमाच्या पुस्तकांतून उमेदवाराने संकल्पना समजून घेणे फार गरजेचे आहे. ज्याचा फायदा उमेदवाराला संदर्भ पुस्तके वाचतांना निश्‍चितपणे जाणवतो. प्रश्‍नपत्रीकांच्या विश्‍लेषणामुळे आयोगाने त्या-त्या वर्षी कोणत्या स्वरुपाचे तसेच कोणत्या घटकाला किती महत्व देत कशा प्रकारचे प्रश्‍न विचारले आहेत याची जाणीव होते. तसेच पुढील नियोजनासाठी या बाबींची फार मदत होते.

8) कोणकोणत्या विषयाची कोणकोणती शालेय पुस्तके वाचावीत?

इतिहास : 6, 8, 11 वी
विज्ञान : 6, 7, 9, 10 वी
भूगोल : 8, 9, 10, 11 वी
पर्यावरण : 9 वी
राज्यशास्त्र : 6, 12 वी
अर्थशास्त्र : 11 वी व 12 वी

उमेदवाराने 5, 8 वी ते 12 वी ची शक्य असल्यास सर्व पुस्तके वाचणे अपेक्षीत आहे, ते शक्य नसेल तर किमान वर नमूद निवडक पुस्तकांचे वाचन फायदेशीर ठरते.

9) मुख्य परीक्षेचे स्वरुप कसे आहे?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC Rajyaseva Mains साठीच्या सुधारीत अभ्यासक्रमामध्ये सहा अनिहार्य विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

विषय गुण स्वरुप परीक्षेसाठीचा वेळ
मराठी/इंग्रजी १०० पारंपारिक ३ तास
मराठी / इंग्रजी १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १ तास
सामान्य अध्ययन १ १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
सामान्य अध्ययन २ १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
सामान्य अध्ययन ३ १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २ तास
सामान्य अध्ययन ४ १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी २तास

10) संदर्भ पुस्तके निवडतांना काय काळजी घ्यावी?

स्पर्धा परीक्षेतील यश हे जितके मार्गदर्शक तसेच सातत्यावर अवलंबून आहे, तितकेच ते योग्य संदर्भ ग्रंथाच्या निवडीवर देखील अवलंबून आहे. संदर्भ पुस्तके ही खालील 2 प्रकारची असू शकतील.

A. अभ्यासकांनी लिहिलेली
B. यशस्वी उमेदवार / शिक्षकांनी लिहिलेली
तर पहिल्या प्रकारची पुस्तके सुरवातीला वाचणे अपेक्षित आहे. तर दुसर्‍या प्रकारची पुस्तके ही परीक्षेला सामोरे जाण्याआधी रिवीजन स्वरुपात वाचणे अपेक्षीत आहे.
शक्य झाल्यास विषय तज्ज्ञ किंवा मार्गदर्शकाच्या साहाय्याने पुस्तकांची निवड करावी सुधारीत कितवी आवृत्ती आहे. कोणत्या प्रकाशनाची पुस्तके आहेत याची विशेष काळजी घेणे अपेक्षीत आहे.

11) सराव प्रश्‍नपत्रीका तसेच प्रश्‍नसंग्रह याचे महत्व काय?

सराव प्रश्‍नपत्रीका सोडविणे हा खरोखर अगदी शेवटचा टप्पा मानला जातो. खर्‍या अर्थाने उमेदवाराने दररोज प्रश्‍नसंग्रहातून किमान 100 प्रश्‍नांचे विषयनिहाय वाचण करणे गरजेचे ठरते. जेणेकरुन परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या मागील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍न सोडविण्याबाबतची भिती नाहीशी झालेली असते. तसेच नियोजित वेळेत प्रश्‍नपत्रीकेतील सर्व प्रश्‍न आपण सोडवू शकतो का? याबाबतचे नियोजन करण्यात उमेदवाराला मदत होते.

12) परीक्षेचा अर्ज कसा व कुठे भरायचा?

सदर परीक्षेसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडून जवळपास दरवर्षी विविध पदांसाठी जाहिरात दिली जाते व ऑनलाईन अर्ज मागितले जातात. या परीक्षेबाबतच्या विविध टी, शर्ती, पात्रता या बाबतची अधिक माहिती ही आयोगाच्या mpsc.gov.in चा वेबसाईट वर उपलब्ध आहे. तर उमेदवाराने जाहिरात आल्यानंतर अर्ज करण्यासाठी mahampsc.mahaonline.gov.in या वेबसाईटचा उपयोग करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC

Share This Article